
मुंबई : चिंतामणी गणपतीच्या आगमन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करुन पळून गेलेल्या दोघांना गुन्हा दाखल होताच काळाचौकी पोलिसांनी अटक केली. नूरमोहम्मद अब्दुल जाकीर इनामदार आणि कुंदन चंदन दंतानी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी चोरीचा मोबाईल जप्त केला आहे.
याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून, त्यांच्या अटकेने मोबाईल चोरीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. वैभव हा शनिवारी सायंकाळी पाच वाजता तो चिंतामणी गणपती आगमन मिरवणुकीत सामिल झाला होता. यावेळी तिथे असलेल्या गर्दीचा फायदा अज्ञात चोरट्याने त्याचा मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर लक्षात येताच त्याने काळाचौकी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार केली होती.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या नूरमोहम्मद आणि कुंदन या दोघांनाही अवघ्या एका तासांत पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनीच वैभव शिंदेचा मोबाईल चोरी केल्याची कबुली देताना पोलिसांना चोरीचा मोबाईल दिला. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून, पोलीस उपनिरीक्षक धनंजय व्यवहारे हे गुन्ह्यांचा तपास करत आहेत.