मुंबई: देशभरात लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. चार टप्प्यातील मतदान पार पडलं असून पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कल्याणसह एकूण १३ जागांसाठी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षानं चांगलाच जोर लावला आहे. दरम्यान मुंबईमध्ये आज महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा पार पडणार आहेत. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची सभा होत आहे. तर दुसरीकडे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये इंडिया आघाडीची सभा होणार आहे.
नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर-
आज मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सभा पार पडणार आहे. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे दिग्गज उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल पहिल्यांदाच महाराष्ट्रात-
त्याचवेळी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्लेक्समध्ये इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडणार आहे. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवालदेखील उपस्थित राहणार आहेत. याशिवाय इंडिया आघाडीचे अनेक दिग्गज या सभेत उपस्थित राहणार आहेत. सांयकाळी सात वाजता या सभेला सुरुवात होणार आहे. दरम्यान ईडीच्या अटकेतून जामीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत. ते नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.