विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार ?

सरकारचा मंत्रिमंडळ विस्‍तार मंगळवारी होणार असून, त्यानंतर दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल.
 विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार ?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्‍तार मंगळवारी होणार असल्‍याने रखडलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे समजते. अधिवेशनाची तारीख ठरविण्यासाठी मंगळवारी विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक होत असून त्यात अधिवेशनाच्या तारखेवर शिक्कामोर्तब केले जाईल.

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्‍तार मंगळवारी होणार असून, त्यानंतर दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल. या बैठकीनंतर विधानभवनात कामकाज सल्‍लागार समितीची बैठक होऊन अधिवेशनाचे कामकाज निश्चित केले जाईल. या बैठकीसाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन १८ जुलै २०२२ रोजी होईल, असे घोषित करण्यात आले होते; मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळे आघाडी सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार आले. त्यामुळे पावसाळी अधिवेशन लांबले. दरम्यान, विधिमंडळ सचिवालयाने सोमवारी कार्यालयीन आदेश जारी केला आहे. या आदेशात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० ऑगस्टपासून प्रस्तावित असल्याचे म्हटले आहे; मात्र नवीन मंत्र्यांना तयारी करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून घेण्याचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळ सचिवालयाने मंगळवारी मोहरमच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आपले कार्यालय सुरू ठेवले आहे. तसेच ९ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in