केंद्र सरकार कडून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे. त्याच अभियानाचा एक भाग म्हणून उद्यान विभागात शहरातील १३५ उद्यानांमध्ये ३ हजाराहून अधिक रोपांची लागवड केली जाणार आहे. शाळेतील विद्यार्थी,सामाजिक व गृहनिर्माण संस्था या अभियानात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या वेगळ्या अभियानामुळे देशी प्रजातीच्या वृक्षांची वाढ होणार आल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात उत्साहात साजरा करण्याची साद घातली आहे. अमृत मोहोत्सवानिमित्त 'घरोघरी तिरंगा' अभियान राबवले जात आहे. उद्यान विभागाकडून या अंतर्गत वृक्ष लागवड मोहीम राबवण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार उद्यान विभागाने आपल्या उद्यानांमध्ये वृक्ष ध्वजा रोपण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून उद्यान विभाग आपल्या अखत्यारीतील उद्यान तसेच रिक्त भूखंडांवर वृक्षारोपण करणार आहे. यात विभागीय पालिका कार्यालयांमधील उद्यान विभाग, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सामाजिक संस्था सहभाग घेणार आहेत.
पालिकेच्या उद्यान विभागाने यासाठी मुंबईतील १३५ उद्यानाची निवड केली आहे. या उद्यानांमध्ये साधारणता ३ हजार झाडे लावली जाणार आहेत. याची सुरुवात १२ ऑगस्ट ला होणार असून १३,१४, आणि १५ ऑगस्ट या ३ दिवसांमध्ये ही झाडे लावली जातील. उद्यानातील रिक्त जागेचा आढावा घेऊन त्या ठिकाणी २० ते २५ झाडे लावली जातील. या मोहिमेला वांद्रे येथील जॉगर्स पार्कमध्ये सुरुवात केली जाईल, असे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.