कोकणातील बहुतांश गाड्या आता विजेवर धावणार

कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त, जलद होणार आहे.
कोकणातील बहुतांश गाड्या आता विजेवर धावणार

कोकण रेल्वेच्या प्रवासी गाड्या विजेवर चालवण्याच्या टप्पानिहाय कार्यक्रमानुसार येत्या १५ सप्टेंबरपासून दादर-सावंतवाडी तुतारी तसेच मंगला एक्स्प्रेस या गाड्या विद्युत इंजिनासह धावणार आहेत. त्यापाठोपाठ मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस तसेच दिवा - सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्स्प्रेस या प्रवासी गाड्या दिनांक २० सप्टेंबरपासून विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार आहेत. मडगाव ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी गाडी देखील १५ सप्टेंबरपासून विजेवरील इंजिनावर धावणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त, जलद होणार आहे.

विद्युतीकरण पूर्ण झालेल्या कोकण रेल्वेच्या मार्गावर मालगाड्या आणि एक प्रवासी गाडी सोडली तर सर्व प्रवासी गाड्या या विद्युतीकरणाला सहा महिने होऊनही सध्या डिझेल इंजिनवर धावत आहेत. विद्युतीकरणाच्या कामापैकी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या सबस्टेशनची कामे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे प्रवासी रेल्वेगाड्या विजेवर चालवण्याचे नियोजन रेल्वेला लांबणीवर टाकावे लागले होते. मात्र, आता या कामातील रत्नागिरी येथील टीएसएस (ट्रॅक्शन सबस्टेशन) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहे. यामुळे कोकण रेल्वेने येत्या १५ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या विजेच्या इंजिनासह चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या मार्गावरून जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस येत्या १५ ऑक्टोबरपासून तर मुंबई - मंगलोर एक्स्प्रेस १ जानेवारी २०२३ पासून विद्युत इंजिनासह चालवली जाणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वेने माहिती दिली आहे. मुंबई सीएसटी ते करमाळीदरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस १५ ऑक्टोबर २०२२ पासून विद्युत इंजिनासह चालवली जाणार आहे. याचबरोबर उर्वरित गाड्या देखील टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनासह चालवल्या जाणार असल्याने चाकरमान्यांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in