
राज्य सरकारने निधी न दिल्याने आणि अतिरिक्त निधी देण्यास रेल्वे मंडळानेही नकार दिल्यामुळे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) पनवेल ते कर्जत दुहेरीकरण, विरार ते डहाणू चौपदरीकरणाची भूसंपादन प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. याशिवाय कुर्ला ते सीएसएमटी पाचवा, सहावा मार्ग, बोरिवली ते मुंबई सेंट्रल सहावा मार्गाचीही अन्य कामे निधीअभावी रखडली आहेत. थकित एक हजार कोटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी एमआरव्हीसीने पुन्हा राज्य सरकारकडे निधीची मागणी केली असून लवकरच तो देण्याचे आश्वासन मिळाले आहे.
मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर एमआरव्हीसीकडून एमयूटीपीअंतर्गत विविध प्रकल्प राबविले जातात. त्यासाठी राज्य सरकार व रेल्वे मंत्रालय तसेच खासगी बॅंकांकडून निधी मिळतो; परंतु गेल्या तीन वर्षांत एक हजार कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मिळालेला नाही.
रेल्वे मंत्रालयानेही ७०० कोटी रुपये अतिरिक्त निधी एमआरव्हीसीला दिला आहे. एक हजार कोटी रुपये निधी मिळावा, यासाठी एमआरव्हीसी राज्य सरकारकडे निधीची मागणी करत आहे; परंतु अद्यापही तो मिळालेला नाही. रेल्वे मंत्रालयानेही आणखी निधी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एमआरव्हीसीकडून केल्या जाणाऱ्या काही प्रकल्पांच्या कामावर परिणाम झाला आहे.