

मुंबई : मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) टप्पा तिसरा आणि तिसरा-अ अंतर्गत मुंबईला २३८ ‘वंदे मेट्रो’ वातानुकूलित लोकल गाड्या मिळणार आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळानुसार (एमआरव्हीसी), कंत्राट मंजूर झाल्यानंतर अडीच वर्षांत पहिल्या प्रोटोटाइप गाड्या मिळण्याची अपेक्षा आहे. या गाड्यांची चाचणी यशस्वी झाल्यानंतर चार ते सहा वर्षांच्या कालावधीत सर्व गाड्यांचा पुरवठा केला जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) २,८५६ वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदी व देखभालीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यातील प्रत्येक गाडी १२ डब्यांची असेल. हा ताफा सुरुवातीला १२ आणि १५ डब्यांच्या रचनेत धावेल, तर भविष्यात १८ डब्यांच्या गाड्यांची तरतूदही करण्यात आली आहे.
हा उपक्रम मुंबईच्या उपनगरी रेल्वे व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा ठरणार आहे. ३५ वर्षांच्या सर्वसमावेशक देखभाल व्यवस्थेमुळे हा प्रकल्प दीर्घकालीन भागीदारीच्या मॉडेलवर आधारित असून सुरक्षितता, विश्वासार्हता आणि प्रवासी सुविधेवर भर देणारा आहे. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना लाभ मिळणार आहे. अल्पकालीन सुधारणा करण्याऐवजी संपूर्ण नियोजनाकडे वळण्याचा हा दृष्टिकोन असून, उपनगरी प्रवासाचे सर्वांगीण आधुनिकीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
एमआरव्हीसीनुसार, या नव्या गाड्या प्रवाशांसाठी जागा आणि आराम यांची नव्याने व्याख्या करण्यासाठी डिझाइन केले आहे. त्यामुळे गर्दीचे विभाजन होऊन डब्यांतील कोंडी कमी होईल. छतावर व खालच्या बाजूस बसवलेल्या उपकरणांमुळे ‘स्पेस-मॅक्स’ मांडणी साध्य करण्यात आली आहे. उभे राहण्यासाठी व बसण्यासाठी अधिक जागा मिळेल. एर्गोनॉमिक मॉड्युलर कुशन सीट्स, दिव्यांग आणि व्हीलचेअर वापरणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. रुंद खिडक्यांमुळे स्थानके व परिसर अधिक स्पष्टपणे दिसतील, ज्यामुळे प्रवासाचा एकूण अनुभव अधिक सुखद होईल. स्मार्ट क्लायमेट कंट्रोल सुविधांमुळे प्रवाशांचे आरोग्य व आराम यांना प्राधान्य देण्यात आले आहे. भिवपुरी आणि वाणगाव येथे दोन नवे देखभाल डेपो उभारले जाणार आहेत.
प्रवाशांना सातत्याने ताजी हवा मिळणार
प्रगत एचव्हीएसी प्रणालीत उच्च कार्यक्षमतेचे फिल्टरेशन असून विषाणू व जीवाणू कमी करण्यास मदत होईल. मुंबईसारख्या अतिदाट प्रवास परिस्थितीत ही अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे. प्रवाशांच्या प्रत्यक्ष वेळेतील संख्येनुसार ताजी हवा आपोआप नियंत्रित केली जाईल, ज्यामुळे डब्यांतील वातावरण अधिक आरोग्यदायी आणि आरामदायी राहील.
धोकादायक प्रकारांना आळा बसेल
या गाड्यांच्या रचनेत सुरक्षितता हा केंद्रबिंदू आहे. स्थिर व गतिमान अडथळा ओळख प्रणालीसह स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे बसवले आहेत. त्यामुळे फुटबोर्ड प्रवासासारख्या धोकादायक प्रकारांना आळा बसेल. संपूर्ण गाडीत धूर व आग शोध आणि इशारा देणारी प्रणाली असेल. ऑनबोर्ड सीसीटीव्ही कॅमेरे, पॅसेंजर इमर्जन्सी अलार्म आणि इमर्जन्सी टॉक-बॅक प्रणाली सुरक्षा अधिक मजबूत करतील. बाहेरील कॅमेऱ्यांमुळे चढ-उताराचे प्रत्यक्ष वेळेतील निरीक्षण शक्य होईल, तर उच्च दृश्यमानतेचे बाह्य एलईडी डिस्प्ले गंतव्य, रेकची लांबी आणि जलद/धीमीस्थिती स्पष्टपणे दाखवतील.
दीर्घकालीन टिकाऊपणा
मुंबईच्या आव्हानात्मक हवामान परिस्थितीचाही विशेष विचार करण्यात आला आहे. ऊर्जा-कार्यक्षम सिलिकॉन कार्बाइड ट्रॅक्शन तंत्रज्ञानामुळे उष्णता निर्मिती व वीज वापर कमी होईल, तर रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे ऊर्जा पुन्हा ओव्हरहेड प्रणालीत परत दिली जाईल. पाण्याला प्रतिकार करणाऱ्या रचनेसह पूर-प्रतिरोधक अंडरफ्रेम उपकरणे, गंजरोधक अँटी-सॅलाइन कोटिंग्स आणि प्रगत ध्वनी-निरोधक तंत्रज्ञानासह किनारी परिस्थितीत टिकाऊपणा व आराम सुनिश्चित होईल.
वेळापत्रक पाळणे सुलभ होईल
मुंबईच्या गर्दीच्या नेटवर्कसाठी भावी पिढीतील या गाड्या तयार केल्या जात आहेत. १३० किमी प्रतितास कमाल वेगाची क्षमतेमुळे वेळापत्रक पाळणे सुलभ होईल. अत्याधुनिक ट्रॅक्शन तंत्रज्ञानामुळे ऊर्जा कार्यक्षमता वाढेल व कार्बन फूटप्रिंट कमी होईल. एअर-स्प्रिंग सेकंडरी सस्पेन्शनमुळे जास्त वेगातही प्रवास अधिक सहज व आरामदायी राहील. डिजिटल पॅसेंजर इकोसिस्टममध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट्स, इन्फोटेनमेंट, वाय-फाय, प्रवासी माहिती प्रणाली आणि प्रत्यक्ष वेळेतील मार्गदर्शनासाठी डायनॅमिक रूट मॅप्स असतील.