

स्वीटी भागवत/मुंबई : प्रस्तावित नरिमन पॉइंट-कफ परेड कोस्टल कनेक्टरने एक महत्त्वाचा नियामक टप्पा पार केला आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने प्रकल्पाला मंजुरी देऊन अंतिम कोस्टल रेग्युलेशन झोन मंजुरीसाठी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) एका अधिकाऱ्याने बुधवारच्या महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने बैठकीनंतर माहिती दिली की, प्राधिकरणाने या प्रस्तावाला परवानगी दिली असून आता अंतिम पर्यावरणीय मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवला आहे.
सुमारे ५८८.३६ कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नरिमन पॉइंट आणि कफ परेड या दोन महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांना थेट जोडणे हा आहे. ही दोन्ही ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या अगदी जवळ असूनही सध्या केवळ गर्दीच्या रस्त्यांमुळे जोडलेली आहेत.
कोळी बांधवांनी घेतलेल्या आक्षेपानंतर सुधारित प्रस्तावात डिझाइनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. पारंपारिक मासेमारी क्षेत्रांतून जाणाऱ्या समुद्री पुलाऐवजी, हा कनेक्टर आता बहुतांश किनारपट्टीवरून जाईल, ज्यामुळे मासेमारीच्या भागांना वळसा घातला जाईल. हा नवीन मार्ग मच्छीमार नगर, मनोरा आमदार निवास आणि (एनसीपीए) च्या दक्षिण टोकावरून मरीन ड्राईव्हला जोडला जाईल.
या प्रकल्पात १.८६९ किमी लांबीच्या कनेक्टरचा समावेश आहे. ४१८ मीटरचा डबल-डेकर उड्डाणपूल बांधला जाईल.
अंतर एक किमी, लागतात २० मिनिटं
नरिमन पॉइंट आणि कफ परेड दरम्यान अवघे १ किलोमीटरचे अंतर असले, तरी सध्या वाहनचालकांना कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरून जवळपास ५ किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. यामध्ये मादाम कामा रोड, मंत्रालय, फोर्ट आणि मनोरा आमदार निवासाजवळील कोंडीच्या भागांचा समावेश आहे. गर्दीच्या वेळी हा प्रवास करण्यासाठी तब्बल ३० ते ३५ मिनिटे लागतात आणि वाहनांचा सरासरी वेग १२ किमी प्रतितास असतो.
या नवीन कनेक्टरमुळे दोन्ही व्यावसायिक क्षेत्रांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि सध्याच्या रस्ते जाळ्यावरील ताण कमी होईल. तसेच, यामुळे मुंबई कोस्टल रोडशी कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल, ज्याचा फायदा दक्षिण मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना होईल.
हा प्रस्ताव आता केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे असल्याने, टेंडर प्रक्रिया आणि प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यापूर्वी याला अंतिम सीआरझेड मंजुरीची प्रतीक्षा आहे. एकदा मंजुरी मिळाल्यानंतर, हा प्रकल्प मुंबईच्या विस्तारणाऱ्या कोस्टल रोड पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा भाग बनेल. मासेमारी उपक्रमांवर आणि सागरी पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांमुळे कोळी बांधवांनी चिंता व्यक्त केल्यानंतर हा प्रस्ताव रखडला होता. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर एमएमआरडीएने मासेमारी क्षेत्रातील हस्तक्षेप कमी करण्यासाठी या मार्गाच्या आराखड्यात बदल केला.