
मुंबई : वायू प्रदूषणाला आळा बसवण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यानुसार कोळशावर चालणाऱ्या तंदूर भट्ट्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार ८ जुलैपर्यंत कोळशावरील तंदूर भट्टी बंद करून इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. तसेच उपकरणांचा वापर न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. आतापर्यंत ११० ढाबे, रेस्टॉरंट, हॉटेल्सना महापालिकेकडून याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे.
कोळसा तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना मुंबई महापालिकेने नोटीस बजावल्यामुळे आता कोळसा भट्टीतील तंदूर रोटी मुंबईकरांना खाता येणार नाही. आता कोळशाऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर करण्याच्या सूचनादेखील महापालिकेने दिल्या आहेत. यापुढे, मुंबईतील एकही बेकरी आणि ढाबा आता जळाऊ लाकडावर चालणार नाही, त्याऐवजी सीएनजी, पीएनजी वापरावे असे आदेशच आयुक्तांनी सर्व बेकरीचालक, रेस्टॉरंट आणि ढाबाचालकांना दिले आहेत. तसेच हॉटेलचालकांनी ८ जुलैपर्यंत कोळसा तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास मुंबई महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही या नोटीसमधून देण्यात आला आहे.
इलेक्ट्रिक एलपीजी, पीएनजी, सीएनजीचा वापर अनिवार्य
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेच्या हद्दीत लाकूड, कोळसा किंवा इतर पारंपरिक इंधन वापरणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे, कोळसा तंदूर भट्टीचा वापर करणाऱ्या हॉटेल मालकांना आता हॉटेलमध्ये बदल करून इलेक्ट्रिक एलपीजी, पीएनजी, सीएनजी व इतर ग्रीन एनर्जीचा वापर करावा लागणार आहे.
...अन्यथा कारवाईचा इशारा
विशेष म्हणजे, मुंबईत रेस्टॉरंट, बेकरी आणि ढाबाचालकांची संख्या १ हजारांच्या पुढे असून बहुतांश चालक हे विद्युत उपकरणांचा वापर करतात. मात्र, अनेकजण अद्यापही जुन्याच पद्धतीचा अवलंब करत असून धाब्यांवर सर्रासपणे कोळसा भट्टीचाच वापर केला जातो. त्यामुळे, महापालिकेने याची दखल घेतली आहे. रेस्टॉरंट आणि ढाबामालकांनी पालन न केल्यास परवाना रद्द करणे, दंड आणि कायदेशीर कारवाईसह कठोर कारवाई केली जाणार आहे.