

मुंबई : मुंबई आणि बंगळुरू दरम्यान स्लीपर वंदे भारत ट्रेनला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. या नवीन रेल्वे प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर प्रवाशांना एक नवा आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी ही ट्रेन केएसआर बंगळुरूपर्यंत धावणार असून, यामुळे दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवाशांच्या गरजा पूर्ण होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करताना हा प्रवाशांच्या हिताचा एक मोठा निर्णय असल्याचे म्हटले आहे.
या अत्यंत महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले आहेत. फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, मुंबई आणि बंगळुरू या दोन अत्यंत महत्त्वाच्या शहरांमधील प्रवाशांसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून, त्यांना जलद आणि सोयीस्कर प्रवासाची गरज होती.