Mumbai : 'एरंगळ जत्रे'साठी बेस्टच्या ५७ अतिरिक्त बसगाड्या; सकाळी ६ वाजल्यापासून मिळणार सुविधा

मालाड (प) येथील एरंगळ गावात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील रविवारी प्रसिद्ध एरंगळ जत्रा असते. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) यांच्याकडून ५७ अतिरिक्त बसगाड्या उपलब्ध केल्या जाणार आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मालाड (प) येथील एरंगळ गावात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील रविवारी प्रसिद्ध एरंगळ जत्रा असते. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) यांच्याकडून ५७ अतिरिक्त बसगाड्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. दरम्यान, ही अतिरिक्त बससेवा सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत उपलब्ध राहणार असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.

ही यात्रा संपूर्ण दिवस चालत असल्याने चर्चमध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. त्यांना सुलभ व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी मालाड स्थानक (प) ते एरंगळ गाव व मढ जेट्टी, तसेच एरंगळ गाव ते चौपाटी या मार्गांवर बसमार्ग क्र. २७१, तर बोरिवली स्थानक (प) ते मढ जेट्टी या मार्गावर बसमार्ग क्र. ए-२६९ वर विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती

उपनगरीय रेल्वेने मालाड स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन तेथून एरंगळ गाव, चौपाटी व मढ जेट्टीकडे जाणाऱ्या बसफेऱ्यांमध्ये आवश्यक ती वाढ करण्यात आली आहे. प्रवासी व बसप्रवर्तन व्यवस्थापनासाठी मागाठाणे, पोयसर, दिंडोशी, गोरेगाव व ओशिवरा येथील बस आगारांतून अतिरिक्त बसनिरीक्षक व वाहतूक अधिकाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करता येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in