
मुंबई : आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने तिकीट दरवाढीचा मार्ग अवलंबल्यानंतर ९ मेपासून तिकीट दरात वाढ लागू झाली. मात्र, या तिकीट दरवाढीमुळे नाराज झालेल्या प्रवाशांनी ‘बेस्ट’कडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. मात्र, ‘बेस्ट’च्या प्रवासी संख्येत घट झाली असली तरी रोजच्या महसुलात वाढ झाल्याने बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत चांगलीच भर पडत आहे. ९ मे रोजी ‘बेस्ट’ बसमधून २३ लाख १७ हजार प्रवाशांनी प्रवास केला व २ कोटी ९३ लाख ४१ हजार रुपये महसूल बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत जमा झाल्याचे बेस्ट उपक्रमाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
गेल्या १० वर्षांत बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागली असून दिवसेंदिवस आर्थिक कोंडी वाढतच गेली. ही आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिकेकडे पैशांची मागणी केली असता २०१६ ते आतापर्यंत ११ हजार कोटी रुपयांची मदत पालिकेने बेस्ट उपक्रमाला केली. तरीही बेस्टची आर्थिक कोंडी वाढतच गेल्याने अखेर बेस्ट उपक्रमाला तिकीट दरात वाढ करण्यास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली.
मुंबई महापालिकेच्या मंजुरीनंतर ‘रिजनल ट्रॅफिक ऑथोरिटी’ने तिकीट दरवाढीला मंजुरी दिली. अखेर ९ मेपासून तिकीट दरात वाढ झाली. साध्या बससाठी पहिल्या पाच किमीसाठी ५ रुपयांऐवजी १० रुपये, तर वातानुकूलित बससाठी पहिल्या पाच किमीसाठी ६ रुपयांऐवजी १२ रुपये अशी तिकीट दरवाढ झाली. तिकीट दरवाढ झाल्याने बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत भर पडत असली तरी प्रवासी संख्येत घट झाली आहे.
भाडेवाढीपूर्वी प्रवासी संख्या होती ३१ लाख
दरम्यान, बेस्ट बसेसच्या तिकीट दरात वाढ होण्याआधी ८ मे आधी रोज ३१ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करत होते, तर प्रवाशांच्या माध्यमातून रोज १ कोटी ७५ लाखांचा महसूल बेस्टच्या तिजोरीत जमा होत होता.