मुंबई : मुंबईत सलग पडणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी संथ गतीने पाण्याचा निचरा होत आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या शरीरावरील जखम किंवा खरचटलेल्या भागाचा साचलेल्या पाण्याशी किंवा चिखलाशी संपर्क आला आहे. अशा व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी ७२ तासांच्या आत प्रतिबंधात्मक औषधोपचार करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले.
अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ हे सूक्ष्म जंतू असू शकतात. अशा बाधित पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तर लेप्टोस्पायरोसिस हा एक गंभीर आजार असून वेळीच औषधोपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो, असे म्हटले आहे.