

मुंबई : यंदा पावसाचे आगमन लांबणीवर पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर विहिरींची स्वच्छता करत पिण्या व्यतिरिक्त वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावे, पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणाची व्यवस्था उभारावी, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यावर राडारोडा, इतर साहित्य, रस्तेरोधक (बॅरिकेड्स) तातडीने हटवावेत, खड्डेमुक्त रस्त्यांसाठी सिमेंट काँक्रीकटचे रस्ते करण्यावर भर दिला आहे. खड्ड्यांची तक्रार प्राप्त होताच २४ तासांत बुजवा, असे निर्देश त्यांनी दिले. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आराखडा तयार करा, असे निर्देश त्यांनी दिले.
मुंबईतील जलसाठ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पर्यायी स्रोतांचा वापर करणे आवश्यक आहे. वाढती लोकसंख्या आणि हवामानातील बदलांमुळे पाणी व्यवस्थापन आव्हानात्मक बनले आहे. मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय आणि खासगी विहिरी तसेच कूपनलिकांची अद्ययावत माहिती सर्व प्रशासकीय विभागांंच्या (वॉर्ड) सहाय्यक आयुक्तांनी संकलित करावी. विहिरींची दुरुस्ती करताना त्या वापरात येतील याची खात्री करावी. खासगी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेऊन या पाण्याचा वापर करावा. यासाठी स्थानिक नगरसेवक, प्रशासन आणि गृहनिर्माण संस्था यांनी समन्वय साधावा, असे भिडे यांनी नमूद केले.
रस्त्यांच्या दुतर्फा होणारे अनधिकृत पार्किंग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. पालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांचा अधिकाधिक वापर नागरिक आणि रहिवाशांकडून होईल, यासाठी जनजागृती व प्रोत्साहनात्मक उपक्रम राबवावेत. रस्त्यांवरील बेवारस व दीर्घकाळ उभी असलेली वाहने हटविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाशी समन्वय साधून विशेष मोहीम हाती घ्यावी. शाळा, रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक संस्थांच्या परिसरात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार नियोजनबद्ध उपाययोजना राबवाव्यात.