मुंबई : मुंबईतील कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, कबुतरखान्यांबाबत, नागरिकांच्या हरकती/सूचना मागवून अंतरिम निर्णय घेण्याचे निर्देशही माननीय न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, पालिकेने कार्यवाही करून मुंबईत चार नवीन ठिकाणी दाणे टाकण्यास परवानगी दिली आहे, तर याठिकाणी सकाळी ७ ते ९ या वेळेतच कबुतराना दाणे टाकता येणार आहे.
चारही जागांवर कबुतरखान्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे आली तरच ही परवानगी देण्यात येणार आहे. तर कबुतरांना दाणे पुरवल्यामुळे वाहने व पादचारी यांना अडथळा होवू नये, कबुतरखान्याच्या जागी संपूर्ण स्वच्छता राखणे, नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्यांची दखल घेवून योग्य ती कार्यवाही करणे, या कबुतरखान्यांच्या व्यवस्थापनामध्ये सर्व बाबींची दक्षता संबंधित संस्थेला घ्यावी लागणार आहे. तसेच संस्थेकडून प्रतिज्ञापत्र देखील घेतले जाणार आहे. संबंधित प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त हे समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) असतील. या कबुतरखान्यांच्या परिसरात आरोग्याविषयी जनजागृतीकरिता फलकही लावण्यात येणार आहे. कबुतरखान्यांबाबत महानगरपालिकेकडे ९ हजार ७७९ सूचना व हरकती, तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये कबुतरखाना बंद करणे, सुरु ठेवणे, स्वच्छता या राखणे, नियंत्रित पद्धतीने दाणे पुरवणे अशा सर्व पैलूंचा समावेश आहे. कबुतरखान्यांबाबत तज्ज्ञ समितीचा अहवाल व माननीय न्यायालयाचे आदेश येईपर्यंत, अंतरिम कार्यवाही म्हणून महानगरपालिकेने नवीन चार जागांना परवानगी दिली आहे, असे स्पष्ट करण्यात येत आहे.
येथे टाकता येणार दाणे...
कबुतरखाने मुंबईत (१) जी दक्षिण विभागातील वरळी जलाशय (वरळी रिझर्व्हयर), (२) के पश्चिम विभागात खारफुटी परिसर, लोखंडवाला बॅक रोड, वेसावे एसटीपी प्रकल्पाजवळ, अंधेरी पश्चिम, (३) टी विभागात खाडीकडील परिसर, जुना ऐरोली मुलुंड जकात नाका, ऐरोली - मुलुंड जोड रस्ता, मुलुंड (पूर्व), आणि (४) आर मध्य विभागात गोराई मैदान, बोरिवली (पश्चिम) या चार नवीन ठिकाणी असणार आहेत. तर पालिकेने विद्यमान कबुतरखाने सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही. जे कबुतरखाने बंद आहेत, ते बंदच राहतील, असेही स्पष्ट करण्यात येत आहे.