Mumbai : फुटपाथवर यापुढे दुचाकींना नो एन्ट्री! ३८४ कोटी रुपये खर्चून रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवणार

मुंबईतील विशेष करून जंक्शनवर वाहतूककोंडी झाल्यास दुचाकीस्वार फुटपाथवरून आपली वाहने घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले आहे. फुटपाथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून आता ३८४ कोटी ९८ लाख २३ हजार रुपये खर्च करून फुटपाथवर रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवण्यात येणार आहेत.
फुटपाथवर यापुढे दुचाकींना नो एन्ट्री! ३८४ कोटी रुपये खर्चून रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवणार
फुटपाथवर यापुढे दुचाकींना नो एन्ट्री! ३८४ कोटी रुपये खर्चून रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवणार प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईतील विशेष करून जंक्शनवर वाहतूककोंडी झाल्यास दुचाकीस्वार फुटपाथवरून आपली वाहने घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले आहे. फुटपाथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून आता ३८४ कोटी ९८ लाख २३ हजार रुपये खर्च करून फुटपाथवर रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवण्यात येणार आहेत. रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवताना व्हिलचेअर ये-जा करू शकेल, अशी जागा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

मुंबईतील फुटपाथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी आहेत. परंतु फुटपाथवर बेकायदा फेरीवाल्यांनी कब्जा केला असून त्यावरून दुचाकी वाहने जातात कशी, मुंबई महापालिका काही उपाययोजना करणार का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला केला आहे. पालिकेच्या आदेशानंतर आता फुटपाथच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवण्यात येणार आहेत.

पादचारी सुरक्षेला प्राधान्य देत वाहनांची अनधिकृत पार्किंग, फुटपाथवर होणारे अतिक्रमण आणि बेकायदेशीर प्रवेश रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. जीएफआरसी साहित्य टिकाऊ, गंजरोधक आणि दीर्घकाळ टिकणारे असल्याने देखभाल खर्च तुलनेने कमी राहणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

फुटपाथ मोकळे होणार का?

या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश म्हणजे फुटपाथवरील अतिक्रमण आणि दुचाकी किंवा चारचाकी वाहनांची घुसखोरी थांबविणे. रेलिंग्ज व बोलार्ड्स बसविल्यास दुचाकी वाहनांना फुटपाथवर चढणे कठीण होणार आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी मार्ग अधिक सुरक्षित व मोकळा राहण्याची अपेक्षा आहे. विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. शहरातील वाढती वाहतूक आणि बेशिस्त पार्किंगच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प प्रभावीपणे राबविला गेला तर मुंबईकरांना दिलासा मिळू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in