
मुंबई : मुंबईतील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी जल बोगदा महत्वपूर्ण ठरणार आहे. अमर महल ते वडाळा अन् वडाळा ते परळ पर्यंत ९.७ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. भूमिगत जल बोगदा प्रकल्पा अंतर्गत वडाळा ते परळ दरम्यान ५.२५ किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्यातील जल बोगद्याचा ब्रेक थ्रू शुक्रवारी पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आला. जल बोगद्यामुळे भायखळा, परळ, माटुंगा, कुर्ला परिसरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार असून, २०६१ पर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे पाणीगळती, वारंवार बदलणारे भूगर्भीय स्तर, खडक कोसळणे असा खडतर आव्हानात्मक टप्पा पार करत दुसऱ्या टप्प्यातील जल बोगद्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण केले आहे. त्यामुळे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरानंतर १०० किमी लांबीचा जल बोगदा असणारे जगातील दुसरे शहर मुंबई ठरले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील व पाणीपुरवठा प्रकल्पाचे प्रमुख अभियंता पांडुरंग बंडगर आदी उपस्थित होते.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून, त्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मुंबईच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी जल बोगदा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील हेगडेवार उद्यान ते प्रतीक्षा नगर दरम्यानच्या ४.३ किलोमीटर लांबीच्या जल बोगद्याचे खोदकाम ८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू करण्यात आले. ८ ऑगस्ट २०२२ रोजी हे काम पूर्ण झाले. तर प्रतीक्षा नगर ते परळ या ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे खोदकाम १ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर आढळून आलेले भूजल पाझर, वारंवार बदलणारे भूगर्भीय स्तर तसेच बोगद्यात खडक ढासळणे या विविध आव्हानांवर मात करत दुसऱ्या टप्प्याचे खोदकाम यशस्वीरीत्या नियोजित वेळेत पूर्ण करण्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेला यश आले आहे. प्रकल्पाचे ७४ टक्के काम पूर्ण झाले असून, संपूर्ण प्रकल्प एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पालिका प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन, कार्यक्षम व्यवस्थापन व तांत्रिक कौशल्यामुळे मुंबईकर नागरिकांना अखंड, सुरक्षित व पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. जगभरातील सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनांमध्ये मुंबईची पाणीपुरवठा व्यवस्था गणली जाते. पाण्याच्या वहनासाठी जल बोगदे बांधणारी महानगरपालिका भारतातील पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था आहे. जलवितरण व्यवस्थेतील व्यवहार्य पर्याय म्हणून जल बोगद्यांचा वापर केला जात आहे.
एकूण ९० किलोमीटर लांबीच्या प्रलंबित सिमेंट काँक्रीट जल बोगद्यांतून दररोज पाणी आणले जाते. त्यात आता अमर महल ते वडाळा व पुढे परळ पर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जल बोगद्याची भर पडली आहे. मुंबईतील घराघरात पाणी पोहोचविण्यासाठी पालिकेची महाकाय यंत्रणा २४ तास राबत आहे, असे आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी सांगितले.
'असा' आहे जल बोगदा!
हा जल बोगदा सुमारे १०० ते ११० मीटर इतक्या खोलीवर असून बोगद्याचा खोदकाम व्यास ३.२ मीटर आणि अंतर्गत सलोह काँक्रीटचे अस्तरीकरण झाल्यावर संपूर्ण व्यास २.५ मीटर इतका असणार आहे.
'या' भागांत २०६१ पर्यंत पाणीपुरवठा शक्य
या जलबोगद्याद्वारे एफ उत्तर (माटुंगा, वडाळा परिसर), एफ दक्षिण (परळ), अंशतः ई (भायखळा) आणि एल (कुर्ला) विभागातील काही परिसरातील नागरिकांना सन २०६१ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
खोलीचे काम पूर्ण
या प्रकल्पांतर्गत तीन कुपकांचे (shafts) बांधकाम अंतर्भूत आहे. हेडगेवार उद्यान येथील १०९ मीटर, प्रतीक्षा नगर येथील १०३ मीटर आणि परळ येथील १०१ मीटर खोलीच्या तीनही कुपकांचे काम पूर्ण झाले आहे.
विक्रमी नोंदणी!
-हेडगेवार उद्यान येथील ९६.१५ मीटर खोलीच्या कुपकाच्या प्रलंबित सिमेंट काँक्रीटीकरण (आरसीसी) अस्तरीकरणाचे काम केवळ २९ दिवसांत पूर्ण
-जानेवारी २०२२ मध्ये एका महिन्यात ६०५ मीटर लांबीच्या जल बोगद्याचे विक्रमी खोदकाम पूर्ण
-विविध अडचणींना तोंड देत एका दिवसात सर्वोच्च अशा ३४.५ मीटर लांबीच्या जल बोगद्याचे खोदकाम करण्यात यश