

मुंबई : नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळलेच पाहिजेत. भारतीय नागरिक परदेशात नियम पाळतात, मग मायदेशात नियम धाब्यावर का बसवतात, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात व्यक्त केले. टीएमटी बसच्या धडकेत मृत्यू झालेल्या पादचाऱ्याच्या कुटुंबीयांना वाढीव नुकसानभरपाई मंजूर करताना न्यायालयाने वाहतूक नियमांबाबत महत्वपूर्ण भाष्य केले.
९ नोव्हेंबर २०१२ रोजी ठाण्यातील आराधना टॉकीजजवळ रस्ता ओलांडताना सतीश जोशी यांना टीएमटी बसने धडक दिली होती. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जोशी यांचा १६ मार्च २०१३ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने जोशी यांच्या कुटुंबीयांना १३.२३ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर केली होती. भरपाईची रक्कम अपुरी असल्याचा दावा करत जोशी यांच्या पत्नी आणि मुलीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने निर्णय दिला.