

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बोगस मतदान होण्याचा पर्दाफाश काँग्रेसने केला आहे. बोरिवलीत इमारतच अस्तित्वात नसताना त्या इमारतीच्या पत्त्यावर तब्बल १४३ मतदारांची नोंद असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी केला आहे.
मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. बोरिवलीतील आयसी कॉलनी, रोड क्रमांक ५ येथील एका कथित इमारतीत १४३ मतदारांची नोंद दाखवण्यात आली आहे. मात्र काँग्रेसच्या पथकाने त्याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता अशी कोणतीही इमारत अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे.
जेथे इमारतच नाही, तेथे १४३ मतदार कसे? असा सवाल शितल म्हात्रे यांनी उपस्थित केला.
प्रारुप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने अधिकृतपणे हरकती नोंदवल्या होत्या आणि त्या दुरुस्त करण्याचे आश्वासनही निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र अंतिम मतदार यादीत त्रुटी कायम आहेत. आता ही नावे वगळता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत असल्याने, ही लोकशाहीची थट्टा असल्याचे शितल म्हात्रे यांनी म्हटले.
“मतदानाचा हक्क हा संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार आहे. मुंबईकरांचे हक्क चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरेल,” असा इशारा देत ‘नो वोट चोरी मेरी गल्ली में’ हा मुंबईकरांचा सामूहिक संकल्प असावा, असे आवाहन म्हात्रे यांनी केले.