मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) भायखळा तालुका अध्यक्षाच्या हत्येचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून करण्याची घोषणा राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात येईल, अशी माहिती कदम यांनी दिली.
भायखळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या हत्येच्या प्रकरणावर गुरुवारी विधान परिषदेत सदस्य पंकज भुजबळ यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला. राजकीय व्यक्तीची हत्या करून गुन्हेगार परिसरात दहशत पसरवत आहेत. तसेच कुर्मी यांच्या कुटुंबातील व्यक्तींना धमकावत आहेत. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांनीही तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
चर्चेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारातून वाद झाला असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. या प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच कुर्मी यांच्या मुलाला धमकवण्यात येत असल्यास याबाबतही कारवाई करू, असे कदम यांनी सांगितले.