

मुंबई : चेंबूर येथे स्कूल व्हॅनवर पिंपळाचे झाड कोसळून विहान श्रीवास्तव (११) या विद्यार्थ्यांचा करुण अंत झाला तर साकीनाका येथे उघड्या मॅनहोल पडून अस्लम शेख (५५) यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांचा चौकशी अहवाल दोन महिने उलटले तरी गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, चेंबूर दुर्घटनेची फेरचौकशी करण्यासाठी माजी कुलगुरु प्रा. डॉ. संजय देशमुख यांची एकसदस्यीय समिती म्हणून ३० जुलै रोजी नेमणूक करत एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे जाहीर केले. तर साकीनाकातील घटनेची चौकशी सात दिवसात करून त्याचा अहवालही सादर केला जाणार होता.
मात्र चेंबूर दुर्घटनेचा फेरचौकशी अहवाल तयार करण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे, त्यामुळे अहवाल तयार करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी देशमुख यांनी पत्र लिहिले असून मुदतवाढ देण्याबाबत विचार सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
यंदाच्या पावसाळ्यात चेंबूर येथे स्कूल व्हॅनवर पिंपळाचे झाड कोसळले आणि विहानचा दुदैवी मृत्यू झाला. तर साकीनाका येथील खैरानी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम इसाक शेख (५५) यांचा २ जुलै रोजी मृत्यू झाल्याच्या घटनेला जवळपास दोन महिने उलटले असतानाही या प्रकरणातील उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.