

मुंबई : पावसाळ्यात मालाडवासीयांच्या मदतीसाठी २४ बाय ७ आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज झाला आहे. मान्सून काळात पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे कोसळणे तसेच इतर आपत्कालीन परिस्थितिंमध्ये नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रभाग क्रमांक ४ मध्ये डिझास्टर कंट्रोल रूम कार्यान्वित केल्याचे स्थानिक नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी सांगितले. विशेष म्हणजे वायफाय आधारित आधुनिक कॅमेऱ्यांची नजर असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासात नवीन विचारसरणी, युवा नेतृत्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराला चालना देण्यासाठी महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांना संधी दिली आहे. त्यांच्या या दूरदर्शी विचारातून प्रेरणा घेत प्रशासन अधिक गतिमान, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि नागरिककेंद्रित करण्याच्या उद्देशाने हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
आजच्या काळात केवळ पारंपरिक पद्धतींनी समस्यांचे निराकरण करणे पुरेसे नाही. आधुनिक तंत्रज्ञान, रिअल-टाईम मॉनिटरिंग आणि अधिक चांगल्या समन्वयाच्या माध्यमातून नागरिकांना जलद आणि प्रभावी मदत पुरवणे ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. या उपक्रमाचे उद्घाटन रविवारी सकाळी ११ वाजता महाराणा प्रताप गार्डनजवळ, मालाड पश्चिम येथे भाजप मुंबईचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी आणि माजी नगरसेविका जया सतनाम सिंग तिवाना यांच्या हस्ते संपन्न झाले.