मुंबई : मालमत्ता करार, भाडेकरार, वारसा हक्कपत्र यासह इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रांची नोंदणी आता मुंबईतील सहा जिल्हाधिकारी कार्यालयात कुठेही करणे शक्य होणार आहे. महसूल विभागाने दस्त नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल करत मुंबईतील क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द केली आहे. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे मुंबईकरांची धावपळ व वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे महसूल विभागाने मुंबईकरांना ही एकप्रकारे दिवाळी भेट दिली आहे.
मुंबई शहर, अंधेरी, कुर्ला, बोरिवली आणि ओल्ड कस्टम हाऊसजवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील जिल्हाधिकारी या ६ कार्यालयांपैकी कोणत्याही ठिकाणी दस्त नोंदणी करता येणार आहे. आधी ज्या भागात व्यक्ती किंवा व्यवसाय होता, त्या भागातीलच कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक होते, पण आता ती अट काढून टाकण्यात आली आहे. आतापर्यंत क्षेत्रीय अटीमुळे लोकांना दूरच्या कार्यालयात जाण्याची, रांगेत उभे राहण्याची आणि विलंब सहन करण्याची वेळ येत होती.
परंतु आता नागरिकांना आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही कार्यालयात नोंदणी करता येणार आहे. महसूल विभागाने या निर्णयासंदर्भात अधिकृत राजपत्र जारी केले असून, सुधारणा तत्काळ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच ही सुविधा नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
जमीन मोजणीचा निर्णय दिलासादायक
जमीन मोजणीसाठी सध्या ९० दिवस ते १६० दिवस लागायचे. आता जमीन मोजणी ३० दिवसांत पूर्ण होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे.