मुंबई : मुंबईमध्ये दिवसेंदिवस वायू प्रदूषणात वाढ होत आहे. यासाठी मुंबई महापालिका अनेक उपाययोजना राबवत असल्याचा दावा करत असली तरी मुंबई भोवताली असलेल्या झाडांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मुंबईत सुरू असलेले रस्त्याचे काम, मेट्रोचे काम, इमारतीचे बांधकाम यामधून निर्माण होणारी धूळ ही संपूर्ण झाडांवर चिकटून राहत आहे. त्यामुळे झाडांना कार्बन डाय ऑक्साईड वायू शोषून घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळेही मुंबईच्या वायू प्रदूषणात घट होत नाही, अशी माहिती पर्यावरणप्रेमींनी दिली.
मुंबई हे देशातील सर्वात गजबजलेले आणि दाट लोकवस्तीचे शहर आहे. वेगाने होणारे शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाढती वाहतूक, बांधकामे हे सर्व घटक शहरातील वायू प्रदूषणात मोठी भर घालत आहेत. परिणामी पीएम २.५ कणांची वाढलेली पातळी माणसांसह झाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहे. जी झाडे ऊन, पाऊस, वादळवारा यांच्यासमोर स्थिर उभी आहेत. ती झाडे रस्त्यांचे काँक्रीटीकरण, इमारतीचे बांधकाम, राडारोडा यांच्यामधून उडणाऱ्या धुळीमुळे हैराण झाले आहे.
मुंबईच्या अनेक उंच झाडांच्या पानांवर तसेच बुंध्यावर धुळीचे थर साचले आहेत. त्यामुळे हे झाड धुक्यात हरवले असल्याचे दिसून येत आहे. मात्र झाडांच्या या स्थितीमुळे झाडांना कार्बनडाय ऑक्साईड वायू शोषून घेताना अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, झाडांसह माणसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, मुंबई महापालिका प्रदूषण काळात तसेच काँक्रीटीकरणसारखी कामे सुरू असताना या उंच झाडांची काळजी कशी घेते, याबद्दल माहिती उद्यान विभागाचे अधीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्याचबरोबर पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे उपायुक्त अविनाश काटे यांनीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रशासन झाडांबद्दल किती गंभीर आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
झाडांचे मुख्य कार्य हे कार्बनडाय ऑक्साईड वायू शोषून घेणे आहे. परंतु, झाडांवर आच्छादलेल्या धूळ तसेच सिमेंटच्या थरामुळे झाडांनाही त्रास होत आहे. पालिका झाडांसाठी काय उपाययोजना राबवत आहे. याबद्दल माहिती विचारले तर त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळत नाही. त्यामुळे झाडांचे मोठे नुकसान होत आहे.
जय शृंगारपुरे, पर्यावरण अध्यक्ष, मनसे