
मुंबई : मुंबईतील अरुंद भागात आगीची घटना घडल्यास आणि घटनास्थळी अग्निशमन दलाच्या यंत्रणा पोहोचण्यास अडथळा ठरणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी दिले. तसेच वर्दळीची ठिकाणे, रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी संबधित विभाग, वॉर्ड वगळता इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने विशेष मोहीम राबवावी, असे आदेश गगरानी यांनी दिले. ते भायखळा येथील राणीबागेतील अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
मुंबईतील विविध योजना, प्रकल्प आदींची तयारी व उपाययोजना तसेच त्यातील अडचणी आदींबाबत महानगरपालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि वनस्पती उद्यान (भायखळा) येथे पार पडली. यावेळी गगराणी यांनी हे निर्देश दिले.
महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी, मुंबईत कोणत्याही बाबींसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी असतील तर त्यांना त्या तक्रारीची सद्यस्थिती सहज जाणून घेता येईल, अशी व्यवस्था असावी. तसेच, नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे, अशाप्रकारचेही निर्देश दिले.
तसेच मुंबईतील सुलभ वाहतूक आणि नागरिकांच्या मार्गक्रमणात अडथळा निर्माण करणारी बेवारस वाहने आणि भंगार तथा टाकाऊ साहित्य तत्काळ निष्कासित करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांनी यावेळी दिले.