

मुंबई : न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यावर भर दिला आहे. तसेच पीओपीच्या गणेश मूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र पीओपीवर सरसकट बंदी घातली गेली तर मोठ्या गणेश मूर्ती बनवायला अडचणी निर्माण होतील. उत्सवाची रया जाऊन मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवावर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे पीओपीला योग्य असा पर्याय देऊन सुवर्णमध्य काढावा, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना पीओपीच्या गणेश मूर्ती की शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवण्यावर अद्याप संभ्रमावस्था आहे. मुंबई महापालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर ठाम आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती ही मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि राज्य सरकारचे विविध विभाग यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करते. मंडळांनी स्थापन केलेल्या मूर्तीच्या उंची, आकारमान, सजावट, देखावे किंवा अन्य कोणत्याही बाबतीत समिती हस्तक्षेप करत नाही. तसेच मंडळांना याबाबतीत कोणतेही निर्देश देत नाही. सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार प्रत्येक मंडळाला आहेत, असे समितीने स्पष्ट केले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पीओपीला बंदी घातली असून ५ मे रोजी त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.