

रैना असायनार/रायगड
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६६) वरील रायगड जिल्ह्यातील सुकळी गावाजवळ शुक्रवारी पहाटे भीषण बस अपघात झाला. खासगी बस उलटल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४३ जण जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास सुकळी घाट परिसरातील तीव्र वळणावर घडला. मुंबई व पनवेलहून गोव्याकडे निघालेली ही बस ४५ प्रवाशांना घेऊन जात असताना चढावाच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस डाव्या बाजूला उलटली.
या अपघातात नाईम निजाम शेख (३३) आणि नीलम वैभव विभूते (४०) यांचा मृत्यू झाला. अपघातात ४३ प्रवासी जखमी झाले असून त्यांना किरकोळ ते गंभीर दुखापती झाल्या आहेत.
बसचालक हेमंतकुमार बाजीराव पाटील (३६) हा वेगात वाहन चालवत होता. तीव्र वळण घेताना त्याने बसवरील नियंत्रण गमावल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बस उलटल्यानंतर अनेक प्रवासी आत अडकले होते.
बचाव पथकांनी त्यांना बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी हलवले. जखमींपैकी २० जणांना नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, ४ जणांना रोहा उपजिल्हा रुग्णालयात, तर १९ जणांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.