

मुंबई : मुंबईच्या विकासासाठी आणि नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा देण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्यात समन्वयाने काम सुरू आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे एक लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची विकासकामे सुरू असून मुंबई महापालिकेला सरकारकडून देय असलेली देय रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य सुनील शिंदे यांनी या विषयी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत ॲड. अनिल परब, जगन्नाथ अभ्यंकर, सचिन अहिर यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
उदय सामंत म्हणाले, मुंबईत पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू असून यामध्ये कोस्टल रोड, शहरातील पूल, रस्ते व नद्यांचे पुनरुज्जीवन, मिठी नदी सुधारणा, एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प, स्ट्राँग वॉटर ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण यासारखे महत्त्वाचे प्रकल्प मुंबईत सुरू आहेत.
मुंबईच्या विकासासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून समन्वयाने विकासकामे केली जात असून त्यामुळे भविष्यात वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरवणे शक्य होणार आहे. कोणत्याही विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे राज्य सरकारने या आधीच स्पष्ट केले असून त्यानुसार पावले उचलली जात आहेत.
मुंबई पालिकेची थकबाकी टप्प्याटप्प्याने देणार
प्राथमिक शिक्षण विभागाकडून मुंबई महापालिकेस देय असलेल्या निधीबाबत सकारात्मक मार्ग काढला जाईल. मुंबई महापालिकेस आरटीई अंतर्गत देय असलेला ८६ कोटी रुपयांचा निधीही तातडीने उपलब्ध करून दिला जाईल तसेच विविध विभागाकडून मुंबई महापालिकेला देय असलेला १० हजार ९३१ कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने दिला जाईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.
दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने पालिकेचे भूखंड
मुंबई महापालिकेचे आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे सांगत उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, महापालिकेचे काही भूखंड दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यातून महापलिकेला अधिकचा महसूल मिळणार असल्याचे उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले.