धर्मेश ठक्कर/मुंबई : भारतीय तटरक्षक दलाने पश्चिम किनारपट्टीवर गस्त आणि टेहळणी वाढवली आहे. समुद्रातील चाचेगिरी आणि दहशतवादी हल्ल्यांचा सामना करण्यासाठी मुंबई हे सागरी बचाव आणि समन्वय केंद्रासाठी मध्यवर्ती ठिकाण तयार केले आहे, अशी माहिती तटरक्षक दलाच्या प. विभागाचे कमांडर भीष्म शर्मा यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना शर्मा यांनी तटरक्षक दलाच्या कार्याची माहिती दिली.
ते म्हणाले की, समुद्रमार्गाने मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. त्यामुळे भारतीय तटरक्षक दल अधिक सतर्क आहे. भारताची किनारपट्टी मोठी असून गुप्तचर यंत्रणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातत्याने टेहळणी केली जात आहे. रत्नागिरी येथे सागरी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची पाकिटे जप्त केली. तशीच पाकिटे गुजरातच्या किनारपट्टीवर दिसली.