
मुंबई : वसईला जाणारी रेल्वे चुकल्याने गोरेगाव येथे पदपथावर गाढ झोपलेल्या दाम्पत्याच्या अवघ्या ३८ दिवसांच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या चौघा जणांना अटक करून वनराई पोलिसांनी बालकाची सुखरूप सुटका केली. निपुत्रिक दाम्पत्याला विकण्यासाठी हे अपहरण करण्यात आले होते.
दोन मार्चला चादरी विकण्यासाठी गोरेगाव येथे आलेल्या सुरेश सलाट आणि सोनी सलाट या दाम्पत्याची वसईला जाणारी रेल्वे चुकल्याने ते गोरेगाव येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बसस्टॉपवर थांबले होते. रात्री त्यांना गाढ झोप लागली असता त्यांचे मूल पळवण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच वनराई पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास करताना अपहरण करणाऱ्या इसमाने पिवळ्या रंगाचे जॅकेट घातले होते आणि त्याच्या रिक्षाच्या मागील हूड याची माहिती पोलिसांच्या हाती आली. आठ दिवसांच्या तपासात अखेरीस मालाड (पश्चिम) येथील अंबुज वाडीत राहणाऱ्या राजू भानुदास मोरे या रिक्षाचालकाला अटक करण्यात आली. अपहरणात त्याला त्याची पत्नी मंगल मोरे हिने साथ दिली होती. मालवणी येथे राहणाऱ्या फातिमा शेख आणि मोहम्मद आसिफ उमर खान या दाम्पत्याला विकण्यासाठी हे अपहरण केल्याचे उघडकीस आले.