

मुंबई : परिसरात बिबट्यांचा वाढता वावर... प्राण्यावर करण्यात आलेले हल्ले... यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती... याप्रश्नी रहिवाशांना दिलासा देण्यासाठी नागरी निवारा येथील संकल्प सहनिवास वसाहतीमधील रहिवाशांमध्ये जनजागृती करून त्यांच्या मनातील शंका दूर करून येथील वातावरण भयमुक्त करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनअधिकारी यांनी जनजागृती अभियानात केलेल्या मार्गदर्शनास रहिवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला. वनअधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे येथील वातावरण भयमुक्त होण्यास मदत झाली आहे.
गेल्या काही दिवसात नागरी निवारा परिषद येथील संकल्प सहनिवास संकुल तसेच रहेजा हाईट्स सोसायटीत भक्ष्य शोधण्यासाठी बिबट्यांचा वावर वाढल्याने या परिसरातील हजारो राहिवाश्यांमध्ये बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भीतीची बाब म्हणजे हे बिबटे सायंकाळी ७ वाजताच या परिसरात दिसून येत असल्याने संध्याकाळी ७ नंतर घरच्या बाहेर पडायचे की नाही? असा प्रश्न रहिवाशांना पडला होता. त्यामुळे याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.