

मुंबई : रस्त्यालगत असलेल्या जुन्या नारळाच्या झाडांवरून नारळ पडून पादचारी तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. कुलाब्यातील कुसरो बाग परिसरात रहिवाशांनी स्वतःच्या पुढाकारातून नारळाच्या झाडांना संरक्षण जाळ्या बसविल्या आहेत. याच धर्तीवर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नारळाच्या झाडांचे सर्वेक्षण करून संरक्षण जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी करणारे पत्र कुलाब्याचे भाजपचे नगरसेवक ॲड. मकरंद नार्वेकर यांनी पालिका आयुक्त व उद्यान अधीक्षकांना लिहिले आहे.
सार्वजनिक रस्ते, उद्याने तसेच अधिक वर्दळीच्या ठिकाणी नारळाच्या झाडांना ‘फॉल प्रोटेक्शन नेट’ (नारळ पडण्यापासून संरक्षण करणाऱ्या जाळ्या) बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे. कुलाबा परिसरात मोठ्या संख्येने जुनी नारळाची झाडे असून या झाडांवरून नारळ अचानक खाली पडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पादचाऱ्यांना दुखापत होण्याबरोबरच रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर, पालिकेने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे. कुलाब्यातील कुसरो बाग परिसरात रहिवाशांनी स्वतःहून नारळाच्या झाडांना संरक्षण जाळ्या बसवल्या आहेत.