

मुंबई : दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरात दोन भाऊ दुकानात उभे राहून गप्पा मारत हसत असताना एका ग्राहकाने गैरसमज करून घेत चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. "माझ्यावर हसत आहेत" असा संशय घेत आरोपीने संतापाच्या भरात दुकानदारावर सपासप वार केल्याने परिसरात खळबळ उडाली.
चेष्टा करत असल्याचा संशय, गैरसमजातून हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी आग्रीपाडा परिसरातील बेबी गार्डन भागात घडली. दोन भाऊ त्यांच्या दुकानात उभे राहून एकमेकांशी गप्पा मारत होते. त्याचवेळी आरोपी फिरोज मन्सुरी दुकानात आला. दोघा भावांना हसताना पाहून ते आपल्यावरच हसत आहेत आणि आपली चेष्टा करत असल्याचा संशय आरोपीला आला. या गैरसमजातून तो संतापला आणि त्याने आपल्या बॅगेतून मोठा चाकू बाहेर काढला. क्षणार्धात आरोपीने एका भावावर चाकूने सपासप वार केले. पाच ते सहा वेळा वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात त्याच्या हाताला खोलवर जखमा झाल्या असून इतरही अनेक ठिकाणी तो जखमी झाला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं समजतंय.
काही तासांतच आवळल्या आरोपीच्या मुसक्या
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या मदतीने काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आली. पोलिस आता आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, किंवा तो मानसिक तणावाखाली होता का, याचाही तपास करत आहेत.