

मुंबई : मुंबईचा महापौर, उपमहापौर, स्थायी समितीसह अन्य समित्यांबाबत महायुतीचे एकमत झाल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुरुवारी रात्री उशिरा सविस्तर चर्चा झाली आणि अंतिम निर्णय झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शितल गंभीर, योगिता कोळी यांची नावे महापौरपदासाठी चर्चेत आहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन १५ दिवस उलटले. मात्र महापौर व उपमहापौर, स्थायी समितीसह अन्य समिती अध्यक्षांच्या नावांची घोषणा झालेली नाही. परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये गुरुवारी रात्री उशीरा डिनर डिप्लोमसी पार पडली. यात मुंबई महापालिकेसंबंधी सर्व निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे येत्या दोन ते तीन दिवसात भाजप आणि शिंदें शिवसेनेच्या नगरसेवकांची कोकण आयुक्तांकडे एकत्रित नोंदणी केली जाणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यात निर्माण झालेल्या पोकळीवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीला जनतेनं कौल दिला. पण भाजप आणि शिंदेंची शिवसेना यापैकी कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. तरीही आता भाजप आणि शिवसेनेनं सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबईच्या महापौरपदासंदर्भात राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शीतल गंभीर, योगिता कोळी यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आयुक्त गगराणी पीठासन अधिकारी
मुंबई महापौर आणि उपमहापौरपदांच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन महापौराची निवड करताना ते कामकाज पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणं अपेक्षित आहे.