Mumbai : महापौर, उपमहापौर स्वप्न पूर्ण करतील - मुख्यमंत्री
Mumbai : महापौर, उपमहापौर स्वप्न पूर्ण करतील - मुख्यमंत्री

Mumbai : महापौर, उपमहापौर स्वप्न पूर्ण करतील - मुख्यमंत्री

बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे व उप महापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
Published on

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे व उप महापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

महापौर, उपमहापौर व सर्व पदाधिकारी या महापालिकेला दिशा देतील व सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करतील. त्यांना पूर्ण ताकद देण्याचे काम आम्ही करू. त्यांच्या माध्यमातून नवीन मुंबई घडविण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पालिका सभागृहात महापौर व उपमहापौर निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते. यावेळी मुंबई शहर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार राहूल शेवाळे, आमदार अमित साटम आदी उपस्थित होते.

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणार - एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अतिशय कार्यक्षम महापौर व उपमहापौर मिळाले आहेत. गेल्या साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. त्या कामाची पोचपावती मुंबईकरांनी दिली. विकासाला प्राधान्य व विकासाला मुंबईकरांनी स्वीकारले आहे. मुंबई जागतिक दर्जाचे शहर करण्याची भूमिका आहे. मुंबई शहरासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्याचे काम आम्ही करू. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकार करणार. त्यांचे झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. मुंबई खड्डेमुक्त रस्ते, प्रदूषणमुक्त करण्याची आमची भूमिका आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याचे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्याचे काम शासन करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तीन वर्षे, ११ महिने, ५ दिवस...

जवळपास चार वर्षे चाललेली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात दीर्घ प्रशासक राजवट बुधवारी महापौरांची निवड झाल्यानंतर आणि गेल्या महिन्यातील निवडणुकीनंतर २२७ सदस्यांचे नवे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर संपुष्टात आली. २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपल्यानंतर महापालिकेचा कारभार चालवण्यासाठी सरकारने प्रशासकाची नियुक्ती केली होती. त्यानंतर वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याने महापालिकेचा दैनंदिन कारभार पाहिला.

मार्च २०२२ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मार्च २०२४ मध्ये त्यांची बदली झाल्यानंतर विद्यमान महापालिका आयुक्त भूषण गगराणी, हे वरिष्ठ आयएएस अधिकारी, यांनी प्रशासक म्हणून सूत्रे स्वीकारली. बुधवारी दुपारी २२७ सदस्यांचे नवे सभागृह अस्तित्वात आले. यानंतर तीन वर्षे, ११ महिने आणि पाच दिवसांनंतर - पालिकेच्या इतिहासातील सर्वात दीर्घ कालावधीची - प्रशासक राजवट आपोआप समाप्त झाली.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राज्य सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासकाने देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेचा इतक्या दीर्घ कालावधीसाठी कारभार पाहण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी १९८० च्या दशकाच्या मध्यात राजकीय कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने पालिकेत प्रशासक राजवट लागू करण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in