

मुंबई : साकीनाका येथील खैरानी मार्गावर खुल्या मॅनहोलमध्ये पडून असलम इसाक शेख यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या स्थळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी भेट दिली. त्यानंतर, राजावाडी रुग्णालयात जाऊन असलम शेख यांच्या कुटुंबीयांची महापौरांनी सांत्वन केले. तसेच यापुढे अशी घटना घडल्यास सक्त कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर रितू तावडे यांनी दिला.
शेख कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची तत्काळ मदत प्रदान करण्यात येणार असल्याचे महापौर तावडे यांनी जाहीर केले.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर रितू तावडे यांनी गंभीर दखल घेतली. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी संपर्क साधून दोषींवर सक्त कारवाई करण्याचे तसेच दुर्घटनेची सविस्तर चौकशीचे निर्देश महापौरांनी दिले.
पावसाळापूर्व तयारीच्या बैठकींमध्ये दोन बाबींवर भर दिला होता. मुंबईतील सर्व मॅनहोलची झाकणे व्यवस्थित लावलेली हवीत. त्याचप्रमाणे सर्व झाडांचे योग्य सर्वेक्षण करून त्यांची स्थिती तपासावी, आवश्यक तेथे फांद्यांची छाटणी करावी आणि वृक्ष उन्मळण्याची जराही शक्यता वाटली तरी तत्काळ संरक्षक उपाययोजना कराव्यात. माझ्यासह उपमहापौर, इतर पदाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांनीही बैठका घेतल्या होत्या आणि सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. नाले स्वच्छता तसेच रस्ते कॉंक्रीटीकरण व इतर कामांकरिता दौरे करतानाही या सूचना वारंवार केल्या होत्या.
पावसात मॅनहोल का खुले ठेवले?
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता असताना खैरानी रस्त्यावरील सदर मॅनहोल खुले करण्याचे कोणतेही कारण नव्हते. कामे करताना तेथे किमान संरक्षक उपाययोजना करणे गरजेचे होते. नागरिकांच्या जीवावर बेतणारी कोणतीही कृती मी कदापि सहन करणार नाही. सार्वजनिक ठिकाणी काम करताना नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही. उघड्या मॅनहोलमुळे निष्पाप नागरिकाने जीव गमावणे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे.