
मुंबई : मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत, तर मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर अखेर सुरू करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महानगर विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त अश्विनीकुमार मुदगल, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या ठाणे व मीरा- भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये घोडबंदर मार्गाचा भाग असलेल्या कापूरबावडी ते गायमुख या १०.३२ किलोमीटर मार्गाच्या सेवा रस्त्याचे काँक्रीटीकरण करून मुख्य रस्त्यामध्ये विलीन करण्याचे काम ३१ डिसेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे व मीरा- भाईंदर पालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावी. विशेषतः मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महाराणा प्रताप पुतळा दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण जलद गतीने करावे अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मेट्रो पुलाखाली उद्याने विकसित करा!
मेट्रोच्या पुलाचे काम करत असताना त्याखालील मोकळ्या जागेमध्ये भविष्यात अतिक्रमण होऊन ते विद्रुप होऊ नये, यासाठी नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या धर्तीवर येथे सुशोभीकरण करून उद्याने उभी करावीत. त्या जागांची चांगल्या प्रकारे देखभाल कराता यावी, यासाठी जाहिरातीच्या मोबदल्यात कायमस्वरूपी देखभाल करणाऱ्या संस्था नेमण्यात याव्यात, अशी सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
मेट्रो स्थानकांना मूळ गावांची नावे द्या!
डोंगरी व मोघरपाडा येथे होणाऱ्या कारशेडच्या प्रकल्पाबाबत देखील या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यात ठाणे व मीरा-भाईंदर शहरात होणाऱ्या मेट्रो स्थानकांना तेथील मूळ गावांची नावे द्यावीत, जेणेकरून तेथे त्या गावची संस्कृती आणि परंपरा या दोन्हीची ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.