Mumbai : मिठी नदी गाळ उपसा करण्यात विलंब; किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल

मिठी नदीतील गाळ उपसा करण्याचे कंत्राट उशिराने देण्यात आले आहे.
Mumbai : मिठी नदी गाळ उपसा करण्यात विलंब; किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल
Mumbai : मिठी नदी गाळ उपसा करण्यात विलंब; किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल(Photo-X/@KishoriPednekar)
Published on

मुंबई : मिठी नदीतील गाळ उपसा करण्याचे कंत्राट उशिराने देण्यात आले आहे. पुढील दोन महिन्यांत वरुणराजाचे आगमन होण्याची शक्यता असताना मिठी नदीची सफाई करण्यात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे, असा हल्लाबोल पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी केला.

पेडणेकर यांनी गुरुवारी मिठी नदीतील गाळ उपसा करण्याच्या कामाची पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. ‘गाळ सफाईसाठी तीन कंत्राटदार नेमले असले तरी एका कंत्राटदारालाच दोन कंत्राटे देण्यात आली आहेत. म्हणजे प्रत्यक्षात दोनच कंत्राटदार काम करत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. तसेच काम उशिरा सुरू झाल्यामुळे १२ दिवसांचा गॅप कसा भरून काढणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गाळ सुकण्यासाठी किमान ४८ तासांचा अवधी लागतो, मात्र अवकाळी पावसामुळे कामात आणखी अडथळे निर्माण होऊ शकतात. कंत्राटदारांनी काम वेळेत पूर्ण केले नाही, तर आम्ही गप्प बसणार नाही. मुंबईकर सगळं पाहत आहेत, असा इशाराही त्यांनी दिला.

कोणी काही बोललं की महापौर स्पष्टीकरण द्यायला येतात. यातच संपूर्ण कार्यकाळ जाणार का?, अशी टीका त्यांनी केली. कंत्राटदारांना गुडघ्यावर आणले, असा दावा केला जातो, मात्र तो अटी शिथिल करूनच का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळात मार्च महिन्यातच पाहणी होत असे, असे सांगत त्यांनी सध्याच्या कामाच्या विलंबावर टीका केली. महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, “आमच्या काळात ६०० कोटींची तूट भरून १०-१५ वर्षांत ९१ हजार कोटींचा बजेट उभा केला. आता त्याची काय अवस्था झाली आहे?”

पर्यावरणाचा बळी!

गारगाई प्रकल्पासाठी खर्च किती होणार आणि किती झाडे तोडली जाणार?, असा सवाल करीत पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी, मुंबईला गोडं पाणी देण्याच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी दिला जात आहे, असा आरोप केला. प्रत्यक्षात दोनच कंत्राटदार काम करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in