मुंबई : मुंबईतील वाढती वाहतूककोंडीची समस्या, पावसाळ्यात मुंबई जलमय होण्याची भीती यापासून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मुंबईतील जंक्शनवर मल्टी-मॉडेल भूमिगत बोगद्यांचे जाळे विस्तारले जाणार आहे. रस्ते वाहतूक, जलवाहिनी, मलवाहिनींची सेवा तसेच विविध सुविधांचे जाळे एकत्रित करून सेवासुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी पालिकेच्या वतीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून प्रकल्प सल्लागाराच्या अहवालानंतर पुढील साडेपाच वर्षांत अशाप्रकारच्या बहुस्तरीय बोगद्यांची उभारणी केली जाणार आहे.
बहुस्तरीय बोगदा प्रकल्पाच्या आराखड्यानुसार एका स्तरावर वाहनांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र बोगदा असेल तर दुसऱ्या स्तरावर पर्जन्य जलवाहिनी, पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी, मलनिःसारण आणि इतर उपयुक्त सेवा सुविधांचे जाळे अशाप्रकारे यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. या दुहेरी रचनेमुळे शहरात पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार असून पूरप्रतिबंधक उपाययोजना अधिक सक्षम होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
पालिका ४,३९२ कोटी रुपये खर्च करणार
महापालिकेच्या या बहुस्तरीत बोगदा प्रकल्पाची माहिती महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात दिली आहे. या प्रकल्पासाठी मुंबई महापालिका तब्बल ४,३९२ कोटी रुपये खर्च करणार आहे.
प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती
या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणी, बृहत आराखडा व सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात डीपीआर तयार करणे, निविदा प्रक्रिया व्यवस्थापन तसेच यासाठीच्या बांधकामाची देखभाल आदी सर्व कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी संबंधित सल्लागारास कार्यादेश देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.