

मुंबई : मृत जनावरांची विल्हेवाट कुठे लावणार, कुठली मृत जनावरे घेऊन जाणार, उंदीर मेल्याची तक्रार केली तर संबंधित विभाग म्हणतो आमचे काम नाही, अशा तक्रारींचा पाढा बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील गटनेते अमय घोले यांनी वाचला.
शहरातील विविध भागांमध्ये आढळणारी मृत जनावरे तत्काळ उचलणे व त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. यावेळी सदस्यांनी प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले.
मृत जनावरांची तक्रार केल्यास त्याचे निवारण कधी करणार, कंत्राटदार म्हणतात जी तक्रार त्याच तक्रारींचे निवारण करणार, मृत जनावरे घेऊन जाणे, विल्हेवाट लावणे यावर देखरेख ठेवणे गरजेचे आहे, अशी सूचना एमआयएमचे नगरसेवक जमिर कुरेशी यांनी केली.
मृत जनावरांचा सोक्षमोक्ष कसा लावणार, गाडी उपलब्ध नसते, दुपारी स्मशानभूमी बंद होते त्यामुळे मृत जनावरे आहे तिथेच परत आणून ठेवतात, याला जबाबदार कोण, असा सवाल टुलिप मिरांडा यांनी केला.
मुंबईत उपक्रम राबवणार -शिंदे
अखेर सर्वपक्षीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित करत सविस्तर माहिती देण्याची मागणी केली. त्यावर ट्रालीसह कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी हा प्रस्ताव असून संपूर्ण मुंबईत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले. सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची सविस्तर माहिती देण्यात यावी, असे सांगत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रस्ताव मंजूर केला.