
मुंबई : शहराच्या विविध भागात असलेल्या कबुतरखान्यांमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार वाढले आहेत. त्यामुळे मुंबईतील कबुतरखाने तत्काळ बंद करण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
कबुतरखाने बंद करण्याबाबत विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, तर आमदार चित्रा वाघ यांनीही कबुतरांमुळे घरातील व्यक्तीला गमवावे लागल्याचे निदर्शनास आणून देत तातडीने मुंबई आणि राज्यातील कबुतरखाने बंद करण्याची मागणी केली. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत यांनी पुन्हा मनपाला कबुतरखाने बंद करण्याची मोहीम एका महिन्यात राबविण्याचे निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन दिले.
आमदार कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. यावेळी सदस्य चित्रा वाघ यांनी चर्चेत सहभाग घेतला. कबुतरखाने आणि त्यामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक त्रासाबाबत मंत्री सामंत यांनी विधान परिषदेत माहिती दिली.
काही कबुतरखाने न्यायालयाच्या आदेशानुसार बंद केले होते. असे सांगून मंत्री सामंत म्हणाले की, ते पुन्हा सुरू झाल्याचे दिसून आले. कबुतरांना धान्य टाकणे थांबण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. महापालिकेला एका महिन्यात कबुतरखाने बंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश लवकरच दिले जातील, असे त्यांनी सांगितले.
मुंबईत ५१ कबुतरखाने
मुंबई मनपा हद्दीत ५१ कबुतरखाने आहेत. या ठिकाणी कबुतरांमुळे श्वसनविकार, दुर्गंधी व प्रदूषण वाढत असून, यावर नियंत्रण आवश्यक आहे. कबुतरखान्यांबाबत तातडीने विशेष मोहीम घेण्याबाबत मुंबई मनपाला आदेश देण्यात येतील, असे मंत्री सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.