

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेला कृत्रिम पवई तलाव बुधवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ओव्हरफ्लो झाला. पवई तलावाचे पाणी पिण्याव्यतिरिक्त औद्योगिक वापरासाठी वापरले जाते.
गतवर्षी १८ जून २०२५ रोजी पवई तलाव सकाळी ६ वाजता भरून वाहू लागला होता. तर त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे ८ जुलै २०२४ रोजी पवई तलाव भरून वाहू लागला होता. पूर्व उपनगरातील पवई परिसरातील निसर्ग सौंदर्यात भर घालणारा हा तलाव आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी क्षारयुक्त असल्याने पिण्यासाठी वापरले जात नाही. या तलावातील पाणी हे प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते.
सोमवारपासून सलग तीन दिवस मुंबई शहर आणि उपनगर परिसरात चांगला पाऊस पडला. त्यामुळे पवई तलावाच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस पडला.
पवई तलावाचे वैशिष्ट्य!
पवई तलाव हा १८९० मध्ये १२.५९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेला कृत्रिम तलाव आहे.
या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले
मुंबई महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे.
या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर आहे. हा तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.
तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर (५४५५ दशलक्ष लीटर) पाणी असते.
हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर त्याचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते.