मुंबई : मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्यात आल्यानंतर आता ७०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना करमाफी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. शिवसेनेने (उबाठा) ७०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना करमाफी देण्याचे सूतोवाच निवडणूक जाहीरनाम्यात केले होते,तर भाजपनेही निवडणूक काळात ७०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना करमाफी देण्याचे वचन जाहीरनाम्यात दिले होते. दरम्यान, सदर प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
ठाकरे सेनेच्या यशोधर फणसेंनी सादर केला प्रस्ताव
मुंबईतील ७०० चौरस फुटांपर्यंत मालमत्तांना करमाफी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या सभागृहात शिवसेनेचे (उबाठा) नगरसेवक यशोधर फणसे यांनी हा प्रस्ताव सादर केला असता महापौर रितू तावडे यांनी त्यास मंजुरी दिली आहे. दरम्यान, याधी ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्तांना कर माफी दिल्याने पालिकेला वर्षाला ४६५ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. त्यात ७०० चौरस फुटांपर्यंत मालमत्तांच्या करमाफीला आता राज्य सरकारने मंजुरी दिली, तर महापालिका प्रशासनाला कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडावे लागणार आहे.
मुंबईकरांनी शहरातच राहावे यासाठी प्रस्ताव
मुंबईतील जागांचे दर गगनाला भिडले आहेत, सर्वसामान्य नागरिकांना मुंबईत घर घेणे अशक्य झाले आहे, आर्थिक भारामुळे अनेक कुटुंबांना आपली सदनिका विकून मुंबईबाहेर स्थलांतर करण्याची वेळ येत असल्याची खंत व्यक्त करत यशोधर फणसे यांनी मूळ मुंबईकरांनी मुंबईतच राहावे आणि त्यांना शहर सोडण्याची वेळ येऊ नये, यासाठी सध्या असलेली ५०० चौ. फुटांपर्यंतची करमाफी मर्यादा वाढवून ती ७०० चौरस फुटांपर्यंत करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या ठरावाच्या अनुषंगाने या संदर्भात राज्य शासनाकडे योग्य ते निवेदन सादर करण्याची विनंती महापौरांना करण्यात यावी, अशी मागणीही ठरावात करण्यात आली होती. याबाबत ठरावाच्या सूचनेला महापालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली आहे.