धोकादायक पदार्थांच्या वाहतुकीसाठी SOP; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कोंडीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेला टँकर अपघात आणि वाहतूककोंडीवर त्यानंतरच्या घाईने उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, तेवढ्या जलद गतीने ती झाली नसल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
धोकादायक पदार्थांच्या वाहतुकीसाठी SOP; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कोंडीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती
धोकादायक पदार्थांच्या वाहतुकीसाठी SOP; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कोंडीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती
Published on

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेला टँकर अपघात आणि वाहतूककोंडीवर त्यानंतरच्या घाईने उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, तेवढ्या जलद गतीने ती झाली नसल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. मात्र, त्याचवेळी ज्वलनशील आणि धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यास काय करायचे? याची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) ठरविण्याबाबत केंद्र सरकारच्या अखत्यारितील तेल कंपन्यांना आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

३ मुंबई-पुणे महामार्गावर फेब्रुवारी २०२६ रोजी प्रोपिलिन हा ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टँकर उलटल्याने झालेल्या वाहतूककोंडीबाबतच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चेतन तुपे यांनी शनिवारी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'भविष्यात पुन्हा कधी अशी दुर्घटना घडू नये यासाठी अशा पदार्थांची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना यासंदर्भात 'एसओपी' तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पद्धतीच्या आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित उपाय तातडीने करण्यासाठीची रेस्क्यु यंत्रणा, साधनसामुग्री आपल्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

'आयटीएमएस'द्वारे प्रवाशांना देणार सूचना

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बसवण्यात आलेली 'आयटीएमएस' ही प्रणाली सध्या कार्यरत आहे. या प्रणालीचा उपयोग करून अशा प्रकारच्या अपघाताच्या प्रसंगी माहिती नागरिकांपर्यंत त्वरित पोहोचवता येईल आणि ट्रॅफिकचे व्यवस्थापन, नियंत्रण, तसेच डायव्हर्शन सुकर करता येईल. आयटीएमएसचा उपयोग करुन अशा घटनांमध्ये प्रवाशांना तातडीने सूचना देण्यासाठीची ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. जेणेकरुन प्रत्येक प्रवाशास अशा पद्धतीच्या परिस्थितीचा संदेश तत्काळ देता येईल. यासाठीची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले. त्याशिवाय अशा आपत्कालीन परिस्थितीत आपण हेलिकॉप्टर वापरतो. पण सूर्यास्तानंतर आपल्याकडे हेलिकॉप्टर वापरता येत नाही. त्यामुळे त्यांच्या वापरावर मर्यादा आहेत. असेही त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in