

मुंबई : मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर गॅस टँकर उलटल्याने निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूककोंडीत अडकलेल्या एक लाखांहून अधिक वाहनधारकांना एकूण ५.१६ कोटी रुपयांचा टोल परतावा देण्यात येणार असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.
३ फेब्रुवारी रोजी खोपोली परिसरात द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटल्याने ३३ तास वाहतूक ठप्प झाली होती. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना पाणी, अन्न आणि इतर मूलभूत सुविधांच्या टंचाईचा सामना करावा लागला. अपघातानंतर प्रशासनाने तत्काळ टोल वसुली स्थगित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तोपर्यंत अनेक वाहनधारकांच्या ‘फास्टॅग’ खात्यांमधून टोलची रक्कम वजा करण्यात आली होती.
‘टोल वसुली थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर वाहनधारकांकडून वसूल झालेली संपूर्ण रक्कम परत करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. ५.१६ कोटी रुपयांचा परतावा ‘एमएसआरडीसी’कडून परत देण्याची प्रक्रिया राबवली जाईल. ही रक्कम पुढील काही दिवसांत संबंधित वाहनधारकांच्या ‘फास्टॅग’ खात्यात थेट जमा केली जाईल,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या परताव्यामध्ये दोन्ही मार्गांवरील वसूल केलेल्या टोलचा समावेश असून, टोल ऑपरेटरला ‘फास्टॅग’ व्यवहारांची सविस्तर माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले.