मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, ५ जण जखमी

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरने बुधवारी सकाळी पाच ते सहा वाहनांना धडक दिल्यानंतर कंटेनप थेट एका 'इनोव्हा' कारवर पलटला. या दुर्घटनेत इनोव्हा कारमधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य पाच जण जखमी झाले आहेत.
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, ५ जण जखमी
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, ५ जण जखमी
Published on

पुणे : पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरने बुधवारी सकाळी पाच ते सहा वाहनांना धडक दिल्यानंतर कंटेनप थेट एका 'इनोव्हा' कारवर पलटला. या दुर्घटनेत इनोव्हा कारमधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य पाच जण जखमी झाले आहेत.

या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये पुण्यातील अंबादास दामू पेटारे, श्रीकांत अनंत जाधव (६३) आणि प्रमोद संतोष पवार यांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या पाच जणांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये कंटेनर चालक अवधेश यादवचाही समावेश आहे.

हा थरारक अपघात सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरचालक अवधेश यादव पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. बोरघाटातील खोपोली एक्झिटजवळील उतारावर कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. अनियंत्रित झालेला हा कंटेनर पुढे असणाऱ्या चार ते पाच वाहनांना एकापाठोपाठ धडकत गेला. त्यानंतर हा कंटेनर डाव्या बाजूला कलंडला आणि थेट एका 'इनोव्हा'वर कोसळला. कंटेनरच्या प्रचंड वजनामुळे इनोव्हा कार अक्षरशः चिरडली गेली आणि त्यातील प्रवाशांना बाहेर निघण्याची संधीही मिळाली नाही.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्यासह पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्यासाठी आयआरबी गस्त पथक, देवदूत यंत्रणा, बोरघाट महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस ठाणे, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, मृत्युंजय देवदूत आणि हेल्प फाउंडेशनच्या पथकांनी अथक परिश्रम घेतले. घटनास्थळी लोकमान्य रुग्णालयाची रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली होती.

या साखळी अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, प्रशासनाने क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त आणि क्षतिग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला, त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या भीषण अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास करत आहेत.

इंदूरमध्ये कार चार्जिंग करताना ७ जण होरपळले

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर येथे टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बृजेश्वरी एनक्लेव्ह परिसरात पहाटे एका घराला लागलेल्या भीषण आगीत ७जणांचा जळून मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक तपासात इलेक्ट्रिक कार चार्जिंगदरम्यान झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित घरात एक कौटुंबिक कार्यक्रम सुरू होता आणि त्यावेळी ८ ते १० जण उपस्थित होते. घराखाली उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये चार्जिंगदरम्यान शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. ही आग पुढे इमारतीत पसरली. अशा स्थितीत घरातील एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच भीषण झाली आणि घरातील लोकांना बाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही.

logo
marathi.freepressjournal.in