
मुंबई : गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या भागांना येता आठवडाभर थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रविवारपर्यंत मुंबई व महानगर प्रदेशात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता. मात्र, सोमवारपासून भारतीय हवामान विभागाने कोणताही पावसाचा इशारा दिलेला नाही. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मात्र मान्सूनच्या सामान्य हालचालींचा भाग म्हणून हलका ते मध्यम पाऊस सुरू राहणार आहे.
मुंबई व उपनगरांसाठी येत्या ४८ तासांच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार, आकाश ढगाळ राहील आणि मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. कमाल तापमान सुमारे ३१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र अजूनही ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यात रायगड, रत्नागिरी, पुणे व साताऱ्याच्या घाटमाथ्यांचा भाग तसेच नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूरसारख्या विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे.
यंदा मान्सून लवकर दाखल झाला होता. मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरी पावसापैकी ४५.७०% पावसाची नोंद झाली आहे. मुंबईला दरवर्षी सरासरी २,२०७ मिमी पाऊस पडतो. २७ जुलै सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, पूर्व उपनगरांमध्ये सर्वाधिक १,११७.४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर पश्चिम उपनगरांत १,०३२.२५ मिमी आणि मुंबईत ८७६.२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
यंदा पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये पाणीसाठ्याची पातळी ९०% पर्यंत पोहोचली आहे. जे मुंबईकरांसाठी दिलासादायक आहे. याच दिवशी मागीलवर्षी ही पातळी ७१.९५% होती, तर २०२३ मध्ये केवळ ६१.५८% होती.
तलावातील पाणीसाठा (जुलै २७ रोजी सकाळपर्यंत)
सात तलावांची एकूण क्षमता - १४,४७,३६३ दशलक्ष लिटर
सध्याचा साठा - १२,९८,२८२ दशलक्ष लिटर (८९.७०%)
प्रत्येक तलावातील पातळी (टक्क्यांमध्ये)
अपर वैतरणा - ८१.८९%
मध्य वैतरणा - ९६.३६%
मोडक सागर - १००%
भातसा - ८७.४६%
तानसा - ९९.६६%
तुळशी - ७५.८१%
विहार - ६९.०१%