

मुंबई : घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात औषध विभागात निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) यांची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे अन्य डॉक्टरांवर कामाचा ताण येतो. विशेष म्हणजे राजावाडी रुग्णालयात दररोज ५०० रुग्ण तपासणी येत असतात. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने अतिरिक्त डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, असे मागणी भाजपचे माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक प्रवीण छेडा यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
औषध विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी होत आहे. एका ड्युटीवरील आरएमओला एका शिफ्टमध्ये तब्बल ४०० ते ५०० रुग्णांची तपासणी करावी लागत आहे. तर नुकत्याच एका रविवारी एका डॉक्टरने एकट्यानेच सुमारे ८०० रुग्णांची तपासणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून आरोग्यसेवेच्या गुणवत्तेवरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या मुंबईत पावसाळ्यातील साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत असून डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णसंख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पत्रात म्हटले आहे. पूर्व उपनगरांसाठी प्रमुख आरोग्य केंद्र असलेल्या राजावाडी रुग्णालयातील औषध विभाग मनुष्यबळाअभावी अडचणीत सापडल्याने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे.
या परिस्थितीची दखल घेत महापालिकेने तातडीने हस्तक्षेप करून औषध विभागात अतिरिक्त निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रवीण छेडा यांनी केली आहे.