
सूर्य आग ओकत आहे, पारा ३५ डिग्री पार अशा रसरसत्या गरमीतही राणी बागेतील पशुपक्षी थंडाथंडा कूल कूल झाले आहेत. कलिंगड, आइस फ्रूट केक, केळी, गारेगार उसाचा रस अशा मेजवानीचा आस्वाद घेत आहेत. वाढता उकाडा जाणवत असल्याने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात ही पशु-पक्ष्यांची विशेष काळजी घेतली जात आहे, असे प्राणी संग्रहालयाकडून सांगण्यात आले. मुंबईचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उकाड्यापासून प्रत्येक जण हैराण झाले आहेत.
मुक्या जनावरांची काळजी घेण्यासाठी इमारत परिसरात पाण्याची भांडी ठेवण्यात येत आहे. वाढता उकाड्यापासून राणी बागेतील पशुपक्षांसाठी विशेष व्यवस्थेसह विशेष आहार उपलब्ध करण्यात येत आहे. या ठिकाणी सुमारे ५० हरणे, २० ते २५ माकडे, हत्तीण, अस्वल, दोन बिबटे, दोन वाघ, दोन तरस, चार कोल्हे आणि शेकडो प्रकारचे पक्षी आहेत. वाढत्या उकाड्यात या सर्वांची विशेष काळजी घेतली जात आहे. ‘गारेगार मेजवानी’चा आस्वाद घेताना प्राण्यांना पाहून या ठिकाणी येणार्या पर्यटकांचेही चांगलेच मनोरंजन होत आहे. यामध्ये प्राण्यांना कलिंगड, चिकू, पेरू, थंडगार ऊस, हत्ती-अस्वलासाठीकेक, माकडांसाठी गोळा, काकडी, मोसंबी, फणस, हिरव्या भाज्या उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले.
थंडगार डुबकी ठरतेय आकर्षण
हत्तीणीला उकाड्यापासून संरक्षण मिळण्यासाठी दररोज सकाळी थंड पाण्याची आंघोळ घालण्यात येत आहे. उकाडा वाढल्यास हत्तीण या ठिकाणच्या छोट्या तलावात वारंवार डुबकी मारते. शिवाय बिबट्या, वाघ, तरस, पाणगेंडा, अस्वल आदींसाठी निवासाजवळ छोटे तलाव बनवण्यात आले आहे. उकाडा वाढल्यास हे प्राणी या तलावात बसून थंडगारपण अनुभवत आहेत.