रो-रो अखेर १ सप्टेंबरपासून सुरू होणार

कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास जलद व आरामदायी व्हावा यासाठी मुंबई ते रत्नागिरी रो रो सेवा कायमस्वरुपी सुरू करण्यात येणार आहे.
रो-रो अखेर १ सप्टेंबरपासून सुरू होणार
Published on

मुंबई : कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास जलद व आरामदायी व्हावा यासाठी मुंबई ते रत्नागिरी रो रो सेवा कायमस्वरुपी सुरू करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवात कोकणवासीयांना जलदगतीने जाता यावे यासाठी गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र समुद्रात उसळणाऱ्या लाटा, मुसळधार पावसाचा अंदाज यामुळे गणेशोत्सवापूर्वी रो रो सेवा सुरू करण्यास स्थगिती दिली आहे. मात्र सप्टेंबरच्या एक तारखेपासून रो रो सेवा कोकणवासीयांच्या सेवेत रुजू होईल, असा विश्वास मत्स्य व्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. प्रवासी वाहतुकीसह चारचाकी दुचाकी वाहने नेण्याची सुविधा रो रोत उपलब्ध असून 'एम टू एम प्रिन्सेस २' ही बोट देशातील पहिली जलद बोट आहे, असेही ते मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

राज्याच्या बंदरे विभागाने या जलवाहतूक सेवेस अंतिम मंजूरी दिली आहे. या रो-रो सेवेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एकूण १४७ परवानग्या मिळाल्या आहेत.

भाऊचा धक्का ते जयगड तीन तास, तर भाऊचा धक्का ते विजयदुर्ग पाच तासात प्रवास करता येणार आहे. येथे जेट्टीची सुविधा असून, जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बसची सुविधाही उपलब्ध आहे. २५ नॉट्स स्पीडची ही 'एम टू एम' नावाची रो-रो बोट असणार आहे. 'एम टू एम प्रिन्सेस १' ही मुंबई ते अलिबाग रो रो सेवा सुरू असून १५ नॉट्सच्या वेगाने धावते. मुंबई ते रत्नागिरी दरम्यान एम टू एम प्रिसेन्स २ ही २५ नॉट्स वेगाने धावते.

अशी असणार आसनव्यवस्था

बोटीत इकोनॉमी वर्गात ५५२ आसनांची व्यवस्था, प्रीमियम इकोनॉमीमध्ये ४४, बिझनेसमध्ये ४८, फस्ट क्लासमध्ये १२ प्रवाशांची क्षमता असेल. ५० चारचाकी, ३० दुचाकी क्षमता ही रो-रो आहे.

प्रवासी/वाहनांसाठीचे दर

इकोनॉमी क्लाससाठी २ हजार ५०० रूपये दर आकारला जाणार आहे. प्रीमियम इकोनॉमीसाठी प्रवाशांसाठी ४ हजार रुपये, बिझनेस क्लाससाठी ७हजार ५००, फस्ट क्लाससाठी ९ हजार रुपये दर आकारला जाणार आहे. चारचाकीसाठी ६ हजार, दुचाकीसाठी १ हजार, सायकलसाठी ६०० रुपये, मिनी बससाठी १३ हजार आणि बसकरिता आसनक्षमतेप्रमाणे दर वाढत जाणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in